या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई रक्कम

Crop insurance : खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना एकूण २ हजार ३०८ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. या पैकी १४ एप्रिलपर्यंत १ हजार ४०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून उर्वरित रक्कम लवकरच वितरित केली जाईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना विविध ट्रीगरमधून पीक विम्याची भरपाई मंजूर झाली आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग अशा चार ट्रीगरअंतर्गत ही भरपाई दिली जाणार आहे.

या भरपाईतून राज्यातील २२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या जिल्ह्यांमध्ये धुळे, नंदूरबार, पुणे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली यांचा समावेश आहे.

खरिप हंगाम २०२४ मध्ये यवतमाळ, नांदेड, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये २५ टक्के अग्रिम भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केल्या होत्या. मात्र यवतमाळ जिल्ह्यात विमा कंपनीने अधिसूचना फेटाळून अग्रिम भरपाईस नकार दिला. तर नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांतील १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना ७०५ कोटी रुपयांची अग्रिम भरपाई मिळणार आहे.

हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना ७०६ कोटी रुपये तर काढणी पश्चात नुकसान भरपाई अंतर्गत १ लाख ४८ हजार शेतकऱ्यांना १४१ कोटी रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.

Leave a Comment