महाराष्ट्र पोलीस भरती अपडेट 2025 : एप्रिल अखेर निश्चित होणार पदसंख्या

महाराष्ट्रामध्ये वाढती लोकसंख्या व गुन्हेगारी यामुळे पोलिस दलावर वाढता ताण जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलिस दलाचे मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय घेतला असून, याचाच एक भाग म्हणून 2024-25 या आर्थिक वर्षात सुमारे १०,००० पोलिसांची भरती करण्याचे नियोजन आखले आहे. ही भरती प्रक्रिया सप्टेंबर 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

भरती प्रक्रियेतील नियोजन व एक पद – एक अर्ज धोरण

या भरती प्रक्रियेला अधिक सुसूत्र बनवण्यासाठी ‘एका पदासाठी एकाच घटकात अर्ज करण्याचे बंधन’ घालण्याचा विचार सुरु आहे. या नियोजनासंदर्भात अप्पर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व विशेष पथके) राजकुमार व्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली हालचाली सुरु असून, पोलिस अधीक्षक व आयुक्तांशी नुकत्याच बैठका घेण्यात आल्या आहेत.

पदसंख्या निश्चितीसाठी मागवलेली माहिती

पोलिस भरतीसंदर्भात एप्रिल अखेरपर्यंत नेमकी किती पदे भरणार आहेत, याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी खालील माहिती विभागांकडून मागविण्यात आली आहे:

  1. 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2025 या काळात सेवानिवृत्ती, मृत्यू, बडतर्फी किंवा बदलीमुळे रिक होणाऱ्या पदांची यादी.
  2. 31 मार्च 2025 पर्यंत पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वा श्रेणीतील कर्मचाऱ्यांची अद्ययावत ज्येष्ठता यादी व सेवेतून बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांचा तपशील.
  3. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व हवालदार या पदांवर पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या, आणि त्यानंतरची रिक्त व उपलब्ध पदांची सद्यस्थिती.
  4. 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीत पोलीस शिपाई, चालक आणि बँड्समन संवर्गातील निव्वळ रिक्त जागांची संख्या (आंतरजिल्हा किंवा गट बदलीमुळे झालेल्या बदलांचा अपवाद).
  5. प्रतिनियुक्ती तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांची यादी, व संबंधित पदे मूळ आस्थापनावर रिक्त मानली गेली आहेत की नाही याबाबत स्पष्टता.
  6. मागील दोन भरती प्रक्रियांमध्ये निवड होऊनही सेवेत न रुजू झालेल्या उमेदवारांची यादी.
  7. 2024-25 या वर्षासाठी नियोजित भरती प्रक्रियेसाठी निश्चित झालेल्या एकूण रिक्त पदांची आकडेवारी.

भरती प्रक्रियेची पुढील दिशा

वरील सर्व माहितीचा अभ्यास करून, राज्य सरकार एप्रिल अखेरपर्यंत रिक्त पदांची अंतिम यादी निश्चित करणार आहे. त्यानंतर, पावसाळ्यानंतर म्हणजेच सप्टेंबर 2025 पासून भरती प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होईल, असे संकेत दिले आहेत.

राज्य सरकारकडून सुरु असलेले हे नियोजन राज्यातील पोलिस दलात नवचैतन्य आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सरकारी घोषणांची नियमितपणे माहिती घेऊन भरती प्रक्रियेची तयारी सुरू ठेवावी.

Leave a Comment