रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सरकारने रेशन कार्ड छपाई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज केल्यास पिवळे, केशरी किंवा पांढरे छापील रेशन कार्ड मिळणार नाही. त्याऐवजी ई-रेशन कार्ड प्रणाली लागू करण्यात येत आहे.
रेशन कार्ड छपाई थांबवण्यामागील मुख्य कारण म्हणजे ई-पॉस (Electronic Point of Sale) प्रणालीचा वापर. नागपूर जिल्ह्याचे अन्नपुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-पॉस प्रणालीद्वारे लाभार्थ्यांना अंगठ्याच्या ओळखीतून धान्य वितरित केले जाते. यामुळे पूर्वी प्रमाणे रेशन कार्डवर वितरणाची नोंद घेण्याची गरज उरलेली नाही. ई-पॉस प्रणालीमुळे सर्व नोंदी ऑनलाइन स्वरूपात राहतात, त्यामुळे रेशन कार्ड छपाईची आवश्यकता संपली आहे.
ई-रेशन कार्ड हे पूर्णपणे वैध असून, शासकीय कामांमध्ये आणि विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी याचा वापर करता येईल.
रेशन कार्डाचे वर्गीकरण उत्पन्न गटानुसार केले जाते.
- पिवळे रेशन कार्ड: दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी.
- अंत्योदय योजना लाभार्थी: पिवळे कार्ड.
- पांढरे रेशन कार्ड: आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांसाठी.
ई-रेशन कार्डवरही लाभार्थी कोणत्या गटाचा आहे, याची स्पष्ट नोंद असेल, ज्यामुळे कोणत्याही योजनांचा लाभ देताना अडचण येणार नाही.
ज्यांच्याकडे सध्या छापील रेशन कार्ड आहे, तेही वैध राहील. मात्र, त्यांना ई-रेशन कार्ड हवे असल्यास त्यासाठी अर्ज करता येईल. सध्या सरकारकडे उरलेल्या छापील रेशन कार्डांचा वापर होईपर्यंत त्यांचे वितरण सुरू राहील. त्यानंतर पूर्ण राज्यभर फक्त ई-रेशन कार्डच लागू असेल.
ई-रेशन कार्डमुळे नोंदी व्यवस्थापन अधिक सोपे होणार असून, गैरवापर टाळता येईल. तसेच, लाभार्थ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ सहज मिळू शकेल.
या निर्णयामुळे रेशन कार्डधारकांची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असून, डिजिटल युगाकडे वाटचाल करताना ही पद्धत फायदेशीर ठरणार आहे.